मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. तेव्हा एक कार्यकर्ता मला वळूनवळून सांगत होता दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा आपण एवढी वर्षे मधली आपण उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आधीच एकत्र यायला हवं होतं. आता जे एकत्र आलो आहोत ते चांगल्या आणि विधायक कामांसाठी एकत्र आलो आहोत. आता जे चांगलं आहे ते करुन दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार हे माझं सरकार आहे ही भावना आज प्रत्येक गोर-गरीबांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज शिवजन्माच्या सोहळ्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याला गर्दी झाली आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे हे भाषण करत होते त्याचवेळी जमलेल्या गर्दीपैकी एकजण ओरडून म्हणाला ते शिवस्मारकाचं लवकर बघा. त्यावरही उद्धव ठाकरेंनी हसून दाद दिली आणि म्हणाले “होय सगळं बघतो. आज लोकांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे काळजी करु नका. शिवनेरी आणखी कशी सजावयची याकडे आम्ही लक्ष देतो आहोत. हे आपलं वैभव आहे”असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवनेरीबाबत ज्या काही मागण्या येतील त्या अटी-शर्थींविना पुढे न्यायच्या आहेत. शिवनेरीवर आपण एक लाईट अँड साऊंड शो सुरु करणार आहोत. सिंहगडावर जसा शो सुरु केला आहे अगदी तसाच आपण शिवनेरीवरही सुरु करणार आहोत. शिवनेरी हे आपलं वैभव आहे कारण तिथे आपलं दैवत जन्माला आलं. या किल्ल्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं.