महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांपासून केंद्र सरकारपर्यंत आणि कंगनापासून ते शरद पवारांवर झालेल्या टीकेसंदर्भात अनेक गोष्टींवर भाष्य केलं. मात्र मुलाखतीमधील एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आजीची म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आईची आठवण झाली. उद्धव यांनी या मुलाखतीमध्ये आपल्या आजीच्या एका इच्छेसंदर्भात भाष्य करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आणि हा एका वर्षातील प्रवास यासंदर्भात काय सांगाल अशा आशयाचा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर उत्तर देताना उद्धव यांनी परिस्थितीमुळे आपल्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागल्याचे म्हटले. "मी प्रामाणिकपणे सांगतो की एक वर्ष पूर्ण झालं. मी शासन प्रशासन या पठडीतला नाही. आमची ही म्हणजेच आदित्यची सहावी पिढी आहे जी महाराष्ट्राची सेवा करत आहे," असं उद्धव म्हणाले. याचबद्दल बोलताना उद्धव यांनी पुढे आपल्या आजींचा उल्लेख केला. "मी माझ्या आजीला म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या आईला कधी बघितलं नव्हतं. माझे आजोबा सांगायचे किंवा बाळासाहेबही सांगायचे की त्या आजीला असं वाटायचं की आपल्या मुलाने गव्हर्मेंट सर्व्हंट व्हावं. माझ्या आजीच्या मुलाने सरकार स्थापन केलं आणि तिचा नातू सरकार चालवतोय. हा असा सगळा योगायोग आहे," असं वक्तव्य उद्धव यांनी आजीच्या इच्छेसंदर्भात माहिती देताना केलं. आणखी वाचा- “कुटुंबावर किंवा मुला-बाळांवर येणार असाल तर…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपण केवळ मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जायचो अशी आठवणही उद्धव यांनी सांगितली. "एका आव्हानात्मक परिस्थितीत मला ही जबाबदारी स्वीकारावी लागली. प्रशासनाचा अनुभव नाही काही नाही. मुंबई महानगरपालिका एवढा वर्षे शिवसेनेला आहे. केवळ निवडणुकीनंतर महापौर निवडून आल्यावर मी महापालिकेच्या सभागृहात जात जायचो," असं उद्धव म्हणाले. आणखी वाचा- सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका : उद्धव ठाकरे सरकारने काम हाती घेतल्यानंतर लगेच करोनाचं संकट आलं. मात्र सर्व सहकारी पक्ष आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला उत्तम सहकार्य केलं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी वर्षभरातील वाटचालीसाठी सहकार्यांचे आभार मानले. "कामाला सुरुवात केल्यानंतर करोनाचं संकट आलं यामध्ये माझ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी इतर सहाकाऱ्यांनी जे सहकार्य केलं आहे ते कौतुकास्पद आहे. वेगवगळे सचिव आणि अधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे आतापर्यंत एका वर्ष चांगल्या पद्धतीने गेलं. पुढीच चार वर्षे तर किमान काम करु आणि पुढचं पुढे बघू," असंही उद्धव म्हणाले.