माळीण दुर्घटनेची आठवण देणारी घटना गुरुवारी रायगड जिल्ह्यात घडली. अतिवृष्टी झाल्याने महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळली. दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली ३५ पैकी ३२ घरं गाडली गेली. कालपासून (२३ जुलै) तळीयेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दरम्यान, दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या तळीये गावाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे मुंबईवरून हेलिकॉप्टरने रवाना झाले. तळीये गावात गुरुवारी घटना घडली, मात्र पूरपरिस्थिती आणि संपर्क यंत्रणा कोलमडल्याने दुर्घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचू शकली नाही. शुक्रवारी सकाळी पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आलं. तोपर्यंत मृतांचा आकडा वाढला.

मुसळधार पाऊस कोसळत असतानाच तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत ४० लोक मरण पावले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच गडप झालं. त्यामुळे गाव शोकसागरात बुडालं आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे आज (२४ जुलै) दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत. तसंच गावकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.

Raigad landslide : ४४ मृतदेह काढले बाहेर; ५० पेक्षा जास्त माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १२ वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचल्यानंतर ते वाहनाने तळीये गावाकडे रवाना होणार आहेत. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. त्याचबरोबर ग्रामस्थांशी संवाद साधतील. दुपारी ३.२० वाजता ते परत महाडला येतील. नंतर मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत.

maharashtra Floods : चिपळूणमध्ये दीड हजार जणांची सुटका

तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर प्रशासानाकडून घटनेची माहिती घेतील, असं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, दरड कोसळेल्या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मदतीसाठी एनडीआरएफबरोबरच लष्करालाही पाचारण करण्यात आलं असून, शनिवारी सकाळपर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन ठिकाणांहून हे मृतदेह काढण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर ३५ जखमी झालेले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.