करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर अखेर शनिवारपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू झाली असताना दुसरीकडे मूर्ती बदलावरून हिंदुत्ववाद्यांच्या दोन गटात मतभेद उफाळून आले. हिंदू जनजागृती समितीने मूर्तीची झीज झाल्याने नवीन मूर्ती बसविण्याची मागणी कायम ठेवली. तर विश्व हिंदू परिषदेने धर्मशास्त्रांना संमत असलेली अंबाबाईची शुद्ध मूर्ती बदलण्याची गरज नाही, असे विधान करीत मूर्ती बदलण्याच्या मागणीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया न्यायालयाच्या दरबारात गाजत होती. या प्रक्रियेला शासन व न्यायालयाच्या मान्यतेनंतर सुरुवात होत असतानाच हिंदू जनजागृती समितीने वादात उडी घेतली. मूर्तीची झीज झाली आहे ती काही ठिकाणी भग्न पावली आहे. त्यामुळे अशा मूर्तीतून देवत्व कमी होते असे म्हणत समितीने धर्मग्रंथांचा आधार देत नवीन मूर्ती बसविण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बठकीत अमित सनी यांनी नवीन मूर्ती बदलाबाबत ६ ऑगस्टनंतर सर्वसमावेश बठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका शनिवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या वादात नवा रंग भरला. वििहपचे पश्चिम महाराष्ट्र विभाग मंत्री जवाहर छाबडा, जिल्हामंत्री श्रीकांत पोतनीस, जिल्हा कार्याध्यक्ष बाळ महाराज सहमंत्री शिवजी व्यास, बजरंग दलाचे बंडा साळोखे आदींनी पत्रकार परिषदेमध्ये मूर्ती बदलण्याच्या भूमिकेला तीव्र विरोध दर्शविला. अंबाबाईची मूर्ती सिद्ध रूपातील आहे. अगस्ती, पराशर या ऋषींसह गजानन महाराज, शंकर महाराज, स्वामी समर्थ यांनी मूर्तीचा अभिषेक केला आहे. त्यामुळे मूर्ती बदलण्याची गरज नसल्याचे सांगितले. ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्रामध्ये देवीच्या मूर्तीची हीन शब्दात तुलना केली असल्याने त्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश िशदे, अधिवक्ता अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, मधुकर नाझरे यांनी पत्रकार परिषदेत मूर्ती बदलण्याचा मुद्दा कायम असल्याचे स्पष्ट करून सहा ऑगस्टनंतर जिल्हाधिकाऱ्यांशी होणाऱ्या चच्रेवेळी धर्मशास्त्राधारे सबळ पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी श्रीपूजकांच्या स्वैर वर्तनावर टीका करून त्यांच्यासाठी आचारसंहिता घालण्याची मागणी केली.