ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात एका पट्टेदार वाघाची जिवंत तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडून शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती  आहे. या प्रकरणी तीन शिकाऱ्यांना मूल येथील बाजारात वाघनखे, दात व मिशा विकतांना चंद्रपूर वन विभागाच्या पथकाने अटक केली असून अन्य आरोपी, कातडी व हाडांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, वनमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात दोन महिन्यात दोन वाघांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्याने वनखाते हादरले आहे.
शिकार करून वाघाचे अवयव बाजारात विकले जात असल्याची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऑफ इंडिया व मूल येथील वन्यजीव स्वयंसेवी संस्थेचे उमेश गिरे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यावर ती वन अधिकाऱ्यांना दिली. वनखात्याने प्रकरणाचा शोध घेतला असता काही लोक मूल येथील बाजारात वाघांचे अवयव विकत असल्याची माहिती मिळाली. याच आधारे सापळा रचून सोमवारी दिलीप मडावी, रामप्रसाद गुरनुले व विनायक मल्लेलवार या तिघांना अटक केली.  गेल्या काही महिन्यांपासून वाघाचे अवयव व कातडी विक्रीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती नेमकी स्वयंसेवी संस्थांना मिळाल्यावर हे प्रकरण समोर आले. यात भादुर्णीचे आणखी काही गावकरी सहभागी असून सध्या ते फरार आहेत.

शिकारीची पद्धत
* सहा महिन्यांपूर्वी ताडोबा बफर क्षेत्रात भादुर्णी गावालगत कक्ष क्रमांक ४८५ मध्ये रानडुकराच्या शिकारीसाठी जिवंत विद्युत तारा लावल्या होत्या.
* त्यात रानडुकराऐवजी पट्टेदार वाघ अडकला व त्याची शिकार झाली. वाघाचा मृत्यू झाल्याचे लक्षात घेताच कातडी वेगळी करून कुऱ्हाड व सुऱ्याने वाघाच्या शरीराचे तुकडे करण्यात आले.
* यानंतर नखे, दात, मिशा व हाडे वेगळे करून
मास अंधारी नदीत फेकून दिल्याची माहिती शिकाऱ्यांनी दिली.