स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका स्टँडअप शोदरम्यान जोशुआने शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जोशुआचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून अनेक शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

एका स्टँडअप शोमध्ये अग्रिमाने मुंबईजवळ अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या विषयावरुन विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखही केला. उपहासात्मक विनोद करण्याच्या नादात अग्रिमाने, “मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी इंटरनेटवरील सर्वात विश्वासार्ह साईटवर गेले आणि ती म्हणजे क्वोरा” असं म्हटलं. यापुढे तिने क्वोरावर या स्मारकाबद्दल काय काय लिहिलं होतं असं सांगताना, “मला तिथे एकाने लिहिलेला भलामोठ्या आकाराचा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे. यामुळं महाराष्ट्राचं भलं होईल असं या निबंधामध्ये लिहिलं होतं.  तर दुसऱ्या एकाला वाटलं की इथ क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट सुरु आहे. म्हणून त्याने तिथे, या स्मारकात जीपीएस ट्रॅकरसुद्धा असणार स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जिच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल. तर एकाने तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… मी याच शेवटच्या व्यक्तीला फॉलो केलं,” असं अग्रिमा म्हणाली.

अग्रिमाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अग्रिमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलं आहे. तसेच यासंदर्भातील एक व्हिडिओही सरनाईक यांनी सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुजोर कॉमेडियन अग्रीमा जोशुआला ताबडतोब अटक करण्यासंदर्भात मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. आपण या विषयांची अत्यंत गंभीर दखल घेऊन असल्या विकृत कॉमेडियन ला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे,” असं सरनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेटकऱ्यांनाही यासंदर्भात ट्विटवरुन आपला संताप व्यक्त केला आहे.

युवासेनेचे माजी सदस्य रमेश सोलंकी यांनीही ट्विटवरुन अग्रिमावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोलंकी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्तांना टॅग केलं आहे.

आता या प्रकरणामध्ये शिवप्रेमींच्या आणि मराठी बांधवाच्या भावना दुखावल्याप्रकरणी अग्रिमावर करवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.