विविध सामाजिक उपक्रम राबविणा-या सोलापूरच्या लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने यंदाच्या सततच्या नवव्या वर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येत्या २ नोव्हेंबर रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मागील सात वर्षांत या संस्थेने आयोजिलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात १८२६ जोडपी विवाहबध्द झाली आहेत. यंदाच्या विवाह सोहळ्याचा इच्छुक दाम्पत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील मंडळींना प्रोत्साहन देत त्या अनुषंगाने उपक्रम राबविणा-या लोकमंगल फाऊंडेशनची उभारणी भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांनी केली असून यासंस्थेच्या माध्यमातून २००६ पासून दरवर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजिला जातो. २००६ साली १२१, २००७ साली २०१, २००८ साली १७५, २००९ साली १८५, २०१० साली २३२, २०११ साली २०१, २०१२ साली २६३ तर मागील २०१३ साली १७० जोडपी विवाहबध्द झाली आहेत. याशिवाय उत्तर सोलपूर तालुक्यातील बीबी दारफळ तसेच उस्मानाबाद येथेही संस्थेने हाती घेतलेल्या उपक्रमांअंतर्गत जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले आहे. लोकमंगल उद्योग समूहातील कर्मचा-यांचेही सामूहिक विवाह लावण्यात आले आहेत. याबाबतची माहिती संस्थेचे विश्वस्त विजय जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.यंदाचा सामूहिक विवाह सोहळा रविवार, २ नोव्हेंबर २०१४ रोजी सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजिला असून या विवाह सोहळ्याचा लाभ जास्तीत जास्त जोडप्यांना होण्यासाठी सोलापूर शहरासह सर्व तालुक्यांमध्ये तसेच इतर जिल्ह्य़ात मिळून लोकमंगल उद्योगसमूहाच्या ठिकाणी १०१ नोंदणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जाधव यांनी केले आहे. लोकमंगल फाऊंडेशनने केवळ सामूहिक विवाह सोहळ्यांपुरते कार्य सीमित ठेवले नाही तर या उपक्रमात विवाहबध्द झालेल्या तरुणांना लोकमंगल संस्थेने जावयाचा दर्जा देऊन त्यांच्या गरजेप्रमाणे शेती, व्यवसाय, घरबांधणींसाठी लोकमंगल सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जे उपलब्ध करून दिली तर काहीजणांना नोक-या उपलब्ध करून दिल्याची माहितीही जाधव यांनी दिली. यावेळी लोकमंगल फाऊंडेशनचे संचालक शहाजी पवार, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते.