पुस्तकांचे तिसरे जग समृद्ध आहे. पुस्तके वाचली, त्यामध्ये रमले तर स्वत:मध्ये बदल होतोच, त्यामुळे समाजातही परिवर्तन होते.     पुस्तके वाचून मोठी झालेल्या माणसांची दोन उदाहरणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य विनोबा भावे. ज्ञानार्जनाची ओढ, चिंतन यामुळे पुढच्या काळात परिवर्तनामध्ये सहभागी होऊ या, अशी हाक ज्येष्ठ साहित्यिक प्रा. निशिकांत ठकार यांनी दिली.
सोलापुरात परिवर्तन अकादमीच्या प्रोग्रेसिव्ह बुक सेंटरच्या वतीने मनोविकास व लोकवाड्मय गृह या दोन प्रकाशनांच्या पुस्तकांचे प्रदर्शन मोदीखाना परिसरात सोनामाता प्रशालेसमोर सुरू झाले. त्याचे उद्घाटन प्रा. ठकार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हिराचंद नेमचंद वाचनालयाचे डॉ. श्रीकांत कामतकर, विलास शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती. परिवर्तन अकादमीचे रवींद्र मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. या प्रदर्शनात कथा, कविता, सामाजिक, वैचारिक, वैज्ञानिक, मनोविश्लेषणात्मक आदी विविध पुस्तके थेट २० ते ५० टक्के सवलतीने खरेदी करता येतील. त्याचा वाचकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन मोकाशी यांनी केले. डॉ. कामतकर यांनी, रुग्णांना व त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांनाही पुस्तके ऊर्जा देत असतात, असे प्रतिपादन केले. विलास शहा यांनी माढा येथील दोन वाचनालयांसाठी या प्रदर्शनातून ५० हजारांची पुस्तके घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी सांगलीचे माजी आमदार शरद पाटील यांच्यासह प्राचार्य नरेश बदनोरे, प्रा. सत्यव्रत नूलकर, प्रा. विलास बेत, प्रकाश बुरटे, अ‍ॅड. भगवान वैद्य, अ‍ॅड. गोविंद पाटील, अरुण शिखरे, एम. जी. बागवान आदी उपस्थित होते.