राजगोपाल मयेकर

मनुष्यबळाअभावी महसूल विभागावर वादळातील नुकसानीच्या पंचनाम्यांचा ताण असतानाच मंत्र्याच्या आदेशांमुळे आता त्यांची ओढाताण वाढली आहे. या आदेशांमुळे तलाठय़ांना एकाच नुकसानीचे दोनदा पंचनामे करण्याची वेळ आलेली असून वादळाला आठवडा होऊनही अद्याप पंचनाम्याचे काम ३० टक्कय़ांपर्यंत पोहचले आहे.

३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर शासकीय यंत्रणांच्या सज्जतेमुळे दुसऱ्या दिवशीच रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले होते. त्यामुळे तलाठय़ांच्या पंचनाम्याचे काम तात्काळ सुरू झाले. पंचनाम्यात जुन्या निर्देशांप्रमाणे नेमक्या नुकसानीचे तपशील भरण्यात आले. अनेक गावांमध्ये हे काम पूर्ण होत असतानाच पंचनाम्यांचे स्वरूप बदलण्यात आले. त्यानुसार घर, गोठय़ांचे अंशत: किंवा पूर्णत: नुकसान एवढीच नोंद करून एकत्रितपणे नुकसानीची रक्कम नमूद करण्याचे निर्देश देण्यात आले. पंचनाम्यातील हा बदल मंत्र्यांच्या सूचनेने झाल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र यामुळे कामे वाढल्याने पंचनामे पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या.

दापोली तालुक्यात वीज पुरवठा बंद असल्यामुळे पाणी योजनेवर अवलंबून असलेल्या गावांचे हाल झाले आहेत. यामध्ये महसूल विभागाकडून मोठय़ा ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्थिती काय?   दापोली तालुक्यात २८ तलाठी असून १७७ गावे आहेत, तर १०५ गावे असलेल्या मंडणगड तालुक्यात फक्त १६ तलाठी आहेत. यापैकी दापोली तालुक्यात आठवडय़ानंतर फक्त ५४ गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या सर्व गावांमध्ये दोनदा पंचनामे झाले असून तालुक्याची पंचनाम्याची गावनिहाय टक्केवारी ३० टक्कय़ांच्या आसपास आहे. मंडणगड तालुक्यातील पंचनाम्याची परिस्थितीही अशीच आहे. दापोली तालुक्यात चार हजार ३२५ प्रकरणांपैकी ३७ घरे संपूर्णपणे जमीनदोस्त झाली असून तीन हजार ४२२ पक्कय़ा घरांचे अंशत: नुकसान  झाले आहे. तसेच यात १६ कच्ची घरे पूर्णत: आणि ६१९ घरांचे अंशत: नुकसान नोंदविण्यात आले आहे. नुकसानीची ही आकडेवारी १६ कोटी ११ लाख २२ हजार २४९ रुपयांवर पोचली आहे.