मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचं जाहीरपणे समर्थन केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवरुन संभाजीनगर करण्यात आलेला उल्लेखही योग्य असल्याचं सांगितलं. एकीकडे काँग्रेस नामांतराला विरोध करत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र आपण वर्षानुवर्ष ही मागणी करत असल्याचं सांगत भूमिकेवर ठाम असल्याचं दाखवलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. संभाजीनगर उल्लेख योग्य म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला ठणकावलं; म्हणाले… औरंगाबाद नामांतर वादात उदयनराजेंची उडी; म्हणाले “राज्यात उद्रेक…” उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे- सीएमओ ट्विटर हॅण्डलला संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “त्याच्यात नवीन काय केलं मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार”. यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही”. औरंगाबादच्या नामांतरावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले… बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली- "औरंगाबाद नामांतराबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका कायम असून ती आम्ही मांडली आहे. पण मुख्यमंत्र्यांना नेमके काय म्हणायचे आहे.त्याबाबत आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ. तसेच यामध्ये औरंगजेब हा विषय नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान आहे. पण प्रश्न असा आहे की, नामांतराच्या बाबतीत जे राजकारण होते, त्यामुळे माणसात भेद निर्माण होतात. ते होऊ नये यासाठी काँग्रेस विरोध करत असतं," असं त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, "आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित पटवून देऊ. आम्ही एकत्र बसून चर्चा करु. आमची भूमिका कायम आहे. नामांतराला काँग्रेसने नेहमीच विरोध केला आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम केला असून त्याप्रमाणे काम करत आहोत. कुठे मतभेद झाले तर चर्चा करु”.