केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व सामान्य जनतेची फसवणूक केल्याने त्यांच्या विरोधात जनआक्रोशाचे वादळ निर्माण झाले आहे. हे वादळ केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील महायुतीचे सरकार उलथवून टाकील, असे प्रतिपादन राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले. प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र जनआक्रोश मेळाव्यात गुलाम नबी आझाद बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रोहिदास पाटील, बाळासाहेब थोरात, खासदार हुसेन दलवाई, शिवाजी मोघे, नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते. राज्य सरकारच्या विरोधात हाती घेतलेल्या जनआक्रोश आंदोलनाचा प्रारंभ आज करण्यात आला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना गुलाम नबी आझाद म्हणाले, स्वातंत्र्यलढय़ात नगरच्या ऐतिहासिक भूमीचे मोठे योगदान आहे. याच भूमीत ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्याचा निर्णय झाला. आज जनतेला वेठीस धरणारे भाजप-सेनेचे सरकार उलथवून टाकल्याशिवाय हे वादळ थांबणार नाही असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी स्वातंत्र्यलढय़ात ज्या लोकांनी इग्रजांची दलाली केली, तेच लोक सत्तेत बसून आज आम्हाला देशभक्ती शिकवत आहेत, अशी टीका केली. सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत ‘बुरे दिन’ आणले आहेत, अशी टिप्पणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.विरोधी पक्षनेते विखे यांनी नोटाबंदी, वस्तू व सेवा करांचे परिणाम सामान्य माणूस भोगत असून या सरकारला जनता धडा शिकवील असे स्पष्ट केले. या वेळी उपसभापती ठाकरे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार अब्दुल सत्तार, खासदार हुसेन दलवाई, रत्नाकर महाजन यांची भाषणे झाली. या वेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार नसीम खान, निर्मला गावित, भाऊसाहेब कांबळे, आसिफ पठाण, डॉ. शोभा बच्छाव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील आदी उपस्थित होते.