काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे शुक्रवारी संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. कट्टर शरद पवारविरोधक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यातील सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. तब्बल ८ वेळा खासदार राहिलेले बाळासाहेब विखे पाटील यांचे अहमदनगरमधील राजकारणात वर्चस्व होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांच्यावर उपचारही सुरु होते. विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते वडील आहेत. बाळासाहेब विखे पाटील यांचा जन्म १० एप्रिल १९३२ रोजी अहमदनगर जिल्ह्यात झाला. वडील विठ्ठलराव पाटील यांच्याकडून मिळालेला वारसा बाळासाहेब विखेंनी समर्थपणे पुढे नेला. शेतकरी प्रश्न आणि सहकारी क्षेत्राविषयी बाळासाहेब विखेंचा दांडगा अभ्यास होता. सहकार व ग्रामीण विकासाची बीजे त्यांनी मुळा प्रवरा भागात रुजवली. राजकारणातील बाळासाहेब विखे यांची कारकिर्द काहीशी वादग्रस्त होती. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते शिवसेनेतही सामील झाले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद आणि त्यानंतर अवजड मंत्रालयात केंद्रीय मंत्रीपद भूषवले होते. मात्र त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव नेहमीच आघाडीवर होते. पण त्यांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही. पण एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ओळख कायम होती. शरद पवार यांचे ते कट्टर विरोधक होते. सामाजिक कार्यातील योगदानासाठी केंद्र सरकारने २०१० मध्ये त्यांना प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 'पुरस्कार मिळाला म्हणून मी मोठा होत नाही, मी तुमच्यातलाच आहे' असे भावूक विधान त्यांनी प्रवरानगरमधील एका कार्यक्रमात केले होते. या विधानातून त्यांची शेतक-यांप्रती असलेली आत्मियता दिसून येते. पद्मभूषण पुरस्कारासोबतच राष्ट्रीय बंधुता पुरस्कार, सहकार महर्षी गणपतराव साठे जीवनगौरव पुरस्कार, राष्ट्र सेवा पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे २००८ मध्ये जीवनगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आला होता. आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना उभारुन विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार क्षेत्राला नवीदिशा दिली होती. यासाठी विठ्ठलराव पाटील यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर बाळासाहेब विखेंनीही वडीलांचा हा वारसा प्रभावीपणे गिरवला. सहकार आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. दोन पद्म पुरस्कार मिळवणारे विखे पाटील हे कुटुंब राज्यातील एकमेव उदाहरण होते.