मुख्यमंत्रिपदाचा डाव हुकल्याने देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. एवढंच नाही तर फडणवीस हे त्यांना आलेल्या वैफल्यातूनच टीका करत आहेत असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

” नव्या सरकारला काम करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी द्यायचा असतो असा महाराष्ट्राचा संकेत आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा संकेत पाळला नाही. मुख्यमंत्रिपद मिळवण्याचा त्यांचा डाव हुकला त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्याच वैफल्यातून फडणवीस हे सरकारवर टीका करत आहेत ” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावरही टीका केली. अमृता फडणवीस या राजकारणात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. मात्र आडनावावरुन टीका करणं हे वैफल्याचं लक्षण आहे. त्यांनी सरकारच्या धोरणात्मक निर्णयांवर खुशाल टीका करावी असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.