तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे हेच सत्य आहे असं म्हणत फेसबुक पोस्टद्वारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. एक सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. करोना, चीन प्रश्न, अर्थव्यवस्था या प्रश्नांवर मोदी सरकार साफ अपयशी ठरल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमकी काय आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट?

“तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा…देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे. कोरोना, चीनसह अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार साफ अपयशी ठरले आहे. त्या सगळ्या अपयशाला झाकण्यासाठीच केंद्र सरकारने सहा महिने संसदेचे कामकाज बंद ठेवले. त्या सगळ्या अपयशांवर संसदेत चर्चा होऊ नये, हीच त्यामागची भूमिका होती.”

“केंद्र सरकारची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा. तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. सरकार म्हणून ज्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करू शकलेले नाही. जगातील कोणत्याच देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटलेले नाही. केवळ आपल्याच सरकारने ते स्पष्ट केले आहे. चीन, कोरोनाची स्थिती व देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार अपयश ठरले असून हे अपयश लपविण्यासाठीच त्यांनी सहा महिने संसद बंद ठेवली.”

“तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. सरकार म्हणून ज्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करू शकलेले नाही. जगातील कोणत्याच देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटलेले नाही. केवळ आपल्याच सरकारने ते स्पष्ट केले आहे.”

“चीन, कोरोनाची स्थिती व देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारला साफ अपयश आले आहे. ते अपयश लपविण्यासाठीच त्यांनी सहा महिने संसद बंद ठेवली आहे. कोणत्याच देशाने त्याचे कामकाज बंद ठेवले नव्हते. रशियात बंद होते. तेथे हुकमाशाहीच आहे. मात्र, भारतात ते बंद ठेवले. कारण संसदेत त्या अपयशाची चर्चा त्यांना होऊ द्यायची नव्हती.”

“संविधानात सहा महिन्यापेक्षाही जास्त काळासाठी संसदेचे कामकाज बंद ठेवता येत नाही, तशी तरतूद केली आहे. त्यामुळे त्यांनी सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरंटी नाही.”

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोरासोबतचे फोटो व्हायरल झाले होते. सोशल मीडीयावर याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. दरम्यान या फोटोंचा आधार घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.