राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षाच्या नेतृत्व बदलाचा मुद्दा सद्यस्थितीत गौण आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांचे आंदोलन देशभरात पसरण्यापूर्वी ते संपणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी रात्री कोल्हापुरात व्यक्त केले. येथील पितळी गणपती मंदिर जवळ डॉ. वि. ह.वझे मार्गाच्या नामफलकाचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास श्रीमंत शाहू महाराज,गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील , महापौर निलोफर आजरेकर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील घडामोडींत पेक्षा शेतकरी आंदोलन अधिक महत्त्व असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले गेल्या तीन आठवड्यांपासून अधिक काळ देशभरातील शेतकरी हे कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्लीत आंदोलन करत आहेत. हा मुद्दा संवेदनशील बनलेला आहे. त्याची देशभर व्याप्ती वाढून पडसाद उमटणे पूर्वी त्यावर उचित मार्ग निघणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत काँग्रेस पक्षातील बदलाचा मुद्दा हा गौण आहे. त्यावर पुढे कधीतरी निर्णय घेता येईल. सध्या आंदोलन थांबणे अधिक महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.