राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या १८ समर्थकांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल रात्री त्यांना अटक करण्यात आली होती. आज न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली येथे उपरस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेवरून गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखल ओतून त्यांना धक्काबुक्की केली होती.

नितेश राणे यांनी केलेल्या कृतीचा त्यांचे वडील नारायण राणे यांनीही निषेध करत तातडीने अधिकाऱ्याची जाहीर माफी मागितली होती. कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र या चौपदरीकरणाने महामार्गालगतच्या उपरस्त्यांवर चिखल साचला आहे. रस्त्यांवर खड्डेही पडले आहेत. तेव्हा प्रथम उपरस्त्यांची कामे न करता महामार्ग चौपदरीकरण सुरू असल्याबद्दल जाब विचारायला नितेश राणे आले होते.

‘हे वागणं बरं नव्हं’, नारायण राणेंनी पिळले नितेशचे कान
अधिकाऱ्यावर चिखलफेक; नितेश राणेंना अटक

त्यांच्याबरोबर नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच ‘स्वाभिमान’ संघटनेचे कार्यकर्तेही होते. त्यांनी शेंडेकर यांना जाब विचारला तसेच त्यांना चिखल भरलेल्या रस्त्यावरून चालण्यास भाग पाडले. तसेच नागरिकांना चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून जाणे भाग पडत आहे, असे सांगत ‘हा चिखल कसा असतो, माहीत आहे का,’ असे विचारत त्यांना घोडनदी पुलाच्या कठडय़ाला बांधून त्यांच्यावर चिखलाने भरलेल्या बादल्या ओतल्या. त्यानंतर त्याच अवस्थेत त्यांना काही घरांजवळ नेले आणि तिथे साचलेले पाणी दाखवत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी शेंडेकर यांना धक्काबुक्कीही झाली.

‘मी आमदार म्हणून नाही, तर कणकवलीचा नागरिक म्हणून तुम्हाला जाब विचारत आहे. पहिल्यांदा पंधरा दिवसांत महामार्गालगतचे सर्व उपरस्ते चांगले बनवा नाहीतर ठेकेदाराच्या मशिन्स फोडून टाकीन,’ असा इशाराही राणे यांनी दिला होती. आमच्यावर गुन्हे नोंदवा. आम्ही जनतेसाठी लढत आहोत, असेही त्यांनी शेंडेकर यांना सांगितले. यादरम्यान पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शेडेकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. पण शेंडेकर हे सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर राणे यांच्याविरोधात त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात वर्ग झाली असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली.