राज्यात महाविकास आघाडी सरकारला दीड वर्ष पूर्ण झाली असतानाच स्वबळाचा नारा दिला जात असल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला असताना दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करावी लागेल असं सूचक विधान केलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील आगामी निवडणूक पक्षाने स्वतंत्र लढवली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी नकार दिला. “अजिबात नाही. भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यांना राज्यात सर्व गोंधळ घातला होता. आमचं उद्दिष्ट अद्यापही तेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये इतकी मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी अशक्य -पटोले

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा असं तुम्ही म्हटलं आहे असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. जर काँग्रसेची पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा असेल तर त्यात चुकीचं काय?. जर आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत अशीच पद्धत राहिली आहे”.

शिवसेनेसोबत असणाऱ्या वैचारिक मतभेदासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. पण हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही”.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती होऊ शकते”; गिरीश बापट यांचं मोठं विधान

दरम्यान शरद पवार भाजपाविरोधात महाआघाडीची चाचपणी करत असून त्यात काँग्रेसची काही भूमिका आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवार यांनी काही विरोधकांची बैठक बोलावली आहे. ते स्वागतार्ह आहे. अशा सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. यासाठी कोणती यंत्रणा तयार करण्यात आली आहे हे वेळेसोबत कळेल. जर शरद पवार भाजपाशी लढत असतील तर स्वागत आहे. आम्हाला त्याची चिंता का असावी?”.

राहुल गांधी शिवसेनेपासून सावध भूमिका घेतात का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी, “हे खरं नसून दिल्लीत युती झाल्याची माहिती दिली. शिवसेनेच्या पार्श्वभूमीमुळे थोडीशी भीती होती, पण आम्ही राष्ट्रीय नेतृत्वाला संमत केलं”.