भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ अशी परिस्थिती आहे. जो यांना आरसा दाखवतो त्याच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली जाते अशा शब्दांत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं असून भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच असंही ट्विट करत म्हटलं आहे.

“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, मनमोहन सिंहजी व राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या चुका दाखवण्याचा, सल्ला देण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेच मोदी सरकारच्या मंत्र्यांनी मुजोरपणे टीका केली. काँग्रेस नेत्यांचा सल्ला वेळीच ऐकला असता तर देश आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला नसता, लाखो संसार उघड्यावर पडले नसते, अनेकांना प्रियजनांना मुकावे लागले नसते, निष्पाप बळी गेले नसते, स्मशानात रांगा लागल्या नसत्या. देशाची नाचक्की झाली नसती. याला केवळ भाजपाची मुजोरी, अकार्यक्षमता व अज्ञान जबाबदार आहे,” अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

“त्या पक्षाला उघडं पाडणार”; अदर पूनावाला प्रकरणावरुन आशिष शेलारांचा इशारा

पुढे बोलताना ते म्हणाले की, “नाना पटोले यांनी अदर पुनावाला यांच्या तक्रारीवरून सवाल केला. लसीकरणाबाबत मोदी सरकारच्या नियोजनशून्यतेवर बोट ठेवले. करोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्राने रेमडेसिविर व लसींची निर्यात का केली हा प्रश्न उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने हेच प्रश्न विचारले असतानाही आशिष शेलार यांनी भाजपाची मुजोरपणाची परंपरा कायम राखली”.

“भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच. त्यामुळे कालाकांडी वगैरे भाषाही त्यांनाच शोभू जाणे. भाजपा नेत्यांनी कितीही टवाळखोरी केली तरी काँग्रेस जनतेचा आवाज उचलत राहील,” असंही ते म्हणाले आहेत.

आशिष शेलारांची नाना पटोलेंवर टीका –
“नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही, माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी,” अशी टीका आशिष शेलार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.