केंद्रातील सरकार नव्या कृषी विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे हित साधणार आहे, असे भाजपाच्या नेत्यांनी गळ्यात पक्षाचा मफलर घालून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगण्याची हिंमत दाखवावी. त्यावर शेतकरीचं त्यांना पायातील काढून उत्तर देतील, अशी तिखट प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "भाजपा शेतकरी विरोधी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. कृषी कायद्यात बद्दल होणार नाही, हे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान यालाच समर्थन देत आहे". आणखी वाचा- हा राजकीय बंद नाही, त्यामुळे जनतेने स्वयंस्फुर्तीनं यात सहभागी व्हावं – संजय राऊत "नव्या कृषी कायद्यातून शेतकऱ्यांचा कसलाही लाभ होणार नाही. अंबानीची जिओ कंपनी सुरू झाल्यावर शासकीय बीएसएनएल दूरध्वनी कंपनी देशोधडीला लागली. तशीच अवस्था शेतकऱ्यांची या विधेयकामुळे होणार आहे," असा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. "इचलकरंजी कापड व्यापारी दिवाळे काढून वारंवार पळून जातात. तसेच शेतकरी कायद्यामुळे कार्पोरेट कंपन्या पळून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसचा उद्याच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देणार आहे," असेही यावेळी त्यांनी सांगितले. आणखी वाचा- झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी ‘भारत बंद’ महत्त्वाचा! "त्यासाठी शेतकऱ्यांनी घर, शेत, बांधावर काळा झेंडा लावावा. लोक रस्त्यावर आल्यावर भाजपाचे सरकार घाबरत नाही, पण सोशल मीडियावर टीका व्हायरल झाली की बैचेन होतात. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते, नागरिकांनी उद्या मोबाइलवर निषेधदर्शक काळा डीपी लावावा," असे आवाहन त्यांनी केले.