राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राजसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. या घटनेची सध्या चर्चा सुरू असून, काँग्रेसनं यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर टीका केली आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो. शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखं राज्य चालवत आहे. जाहीर निषेध," अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो. शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे. जाहीर निषेध! — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 23, 2020 शपथविधी वेळी काय घडलं? भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळे सभापती नायडू यांनी त्यांना समज दिली. शपथ घेतल्यानंतर उदयराजे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. त्यावर, हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही, अशी समज नायडू यांनी उदयनराजे यांना दिली होती.