देशातील करोना परिस्थिती, इंधन दरवाढ, महागाई आदी मुद्य्यांवरून मोदी सरकारवर अगोदरच विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना, आता यामध्ये आणखी एका मुद्य्याची भर पडली आहे. कारण, आता रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या आदेशानुसार बँकांनी स्वयंचलित टेलर मशिन्सवर अर्थात एटीएमवर शुल्क आकारू शकणार्‍या इंटरचेंज फी मध्ये वाढ करण्यात आली असून, आज पासून म्हणजेच १ ऑगस्टपासून यामध्ये २ रुपये वाढ लागू झाली आहे. या मुद्य्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

”आजपासून एटीएम सुविधा व डेबिट कार्डच्या वापरासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. #अच्छे दिन मध्ये स्वतःचे पैसे महाग झाले. इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा मोदीजी आग्रह धरतच होते. भविष्यात मोदीकृपेने स्वतःच्या पैशाकडे किंवा बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!” अशा शब्दांमध्ये सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये १ ऑगस्टपासून बदल; जाणून घ्या अधिक माहिती

आरबीआयने जूनमध्ये इंटरचेंज फी १५ ते १७ रुपयांनी वाढविली तर बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी फी ५ रुपयांवरून ६ पर्यंत वाढविण्यात वाढ केली. आरबीआयच्या मते, ही फी बँकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे देयकांसाठी (पेमेंटसाठी) केल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी ग्राहकांकडून घेतली जाते. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहक त्यांच्या खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहार करण्यास पात्र असतील.