कामगारही परतत असल्याने बांधकाम व्यवसायाला चालना पालघर : पाडव्यापासून हळूहळू बांधकाम व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. बांधकाम व्यवसायामध्ये तेजी यावी यासाठी सदनिका खरेदी विक्रीवरील मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पालघर जिल्ह्यात मोठा प्रमाणात नागरिकीकरण होत आहे. यामुळे जिल्ह्यात घरांची मागण्या वाढू लागली आहे. करोना प्रादुर्भावाच्या पूर्वी बांधकाम व्यवसाय तेजीत होता. नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी जागोजागी जमिनी घेऊन तेथे गृहसंकुले उभारण्यास सुरू केली होती. तर काहींची कामे पूर्णत्वास आली असतानाच करोनाचे सावट पसरल्याने बांधकाम व्यवसाय पूर्ण ठप्प पडला. सलग सहा ते सात महिने हा व्यवसाय बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले अनेक लहान व्यावसायिक व कामगार यांचा रोजगार हिरावला होता. आर्थिक अडचणीत सापडलेला कामगार वर्ग आपापल्या गावी परतला होता. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. परिणामी टाळेबंदीत शिथिलता आल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना दिसत आहे. आठ महिन्यांनी सर्व काही सुरळीत सुरू झाल्याने तसेच गावी गेलेले कामगार वर्ग परतल्याने बांधकाम व्यावसायिकांनी आपली अपूर्ण कामे सुरू केली आहेत. त्यातच शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने ग्राहकांची सदनिका, जमिनी खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक दिलासा मिळत आहे. कामगार वर्ग गावावरून परतत आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसाय सुरू झाला आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदाही बांधकाम क्षेत्राला होत आहे. पुढे हा व्यवसाय पूर्वपदावर येईल अशी आशा आहे. - आशीष पाटील, विकासक