लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असतो. वधू-वर दोघांनी या दिवसासाठी अनेक स्वप्ने पाहिलेली असतात. विवाहाचा दिवस वधू-वरासह त्यांच्या जवळच्या माणसांच्या आयुष्यभर लक्षात राहतो. त्यामुळे हा दिवस जास्तीत जास्त आनंददायी करण्याचा प्रयत्न असतो. पण कर्जतच्या मुद्रे तालुक्यात या उलट घडले.

लग्नाच्याच दिवशी कर्जत पोलिसांनी नवविवाहित जोडपे आणि त्यांच्या पालकांविरोधात एफआयआर नोंदवला. स्वागत समारंभाच्या हॉलमध्ये १५० पेक्षा जास्त लोक जमल्याने ही कारवाई करण्यात आली. हे लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन आहे. लॉकडाउन नियमानुसार ५० लोकांना एकत्र जमण्याची परवानगी आहे. पण तिथे १५० पेक्षा जास्त लोक जमा झाले होते असे कर्जत पोलिसांनी सांगितले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

सोशल मीडियावरुन पोलिसांना या विवाहाची माहिती मिळाली. पोलिसांनी वधू-वर आणि त्यांच्या पालकांविरोधात कलम १८८, २६९ आणि २७० अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पाच जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे पण अजून अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.