लॉकडाउन लागू होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या गुरुवारी १२९७ वर पोहचली आहे. एका दिवसात महाराष्ट्रामध्ये १६२ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्याचा मृत्यूदर वाढला असून सहा टक्क्यांवर आला आहे. तो सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. करोनाचा फैलाव नियंत्रणात नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.