रायगड जिल्ह्यात करोनाची व्याप्ती वाढली असून जिल्ह्यात चोवीस तासात ५० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे करोनाबाधितांचा जिल्ह्यातील एकूण आकडा ७५७ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात ५० नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील २०, पनवेल ग्रामिण मधील ९, उरणमधील १०, अलिबाग २, कर्जत ३, माणगाव ५ पोलादपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ३५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २,६६४ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील १,८११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ७५७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ९६ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ४०८ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ३१६ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १४७, पनवेल ग्रामीण हद्दीतील ५९, उरणमधील ५१, पेण ४, अलिबाग ६, श्रीवर्धन येथील १, मुरुड ३, कर्जत ४, खालापूर ४, तळा १, रोहा ५, माणगाव २९, महाड १ पोलादपूर ४ करोनाबाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ३०९ जणांचे संस्थात्मक अलगीकरण तर १३ हजार ०९६ जणांचे घरात अलगीकरण करण्यात आले आहे. तर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले २५ हजार ५५२ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

चितांजनक बाब म्हणजे जिल्ह्यात सुरवातीला उत्तर रायगडमधील पनवेल आणि उरण या दोन तालुक्यात करोना प्रसार मर्यादित होता. मात्र, गेल्या २३ दिवसांत जिल्ह्यात मुंबईतून ७० हजारहून अधिक नागरीक दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाची व्याप्ती वाढली आहे. दक्षिण रायगडमधील माणगाव, महाड, पोलादपूर, अलिबाग, मरुड, रोहा, तळा श्रीवर्धन तालुक्यातही करोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरवात झाली आहे. यातील जवळपास सर्वच जण मुंबईतून आलेले आहेत.