मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरली आहे. लष्कर कशाला पाहिजे? आत्तापर्यंत जे काही केलं ते तुम्हाला सांगून करणार आणि तसंच करणार आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं. महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. करोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे हे विसरु नका असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

काल एक चांगली गोष्ट झाली, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक झाली. सगळ्यांना काय करतो आहोत त्याची कल्पना दिली गेली. त्यांच्याकडून सूचना घेण्यात आल्या. मला एका गोष्टीबद्दल समाधान आहे की सगळ्यांनी खूप चांगल्या सूचना दिल्या. काल जी बैठक झाली ते एकजुटीचं वेगळं दर्शन होतं. महाराष्ट्रातले सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी दुणावला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एक वेगळी एकजूट काल पाहायला मिळाली. असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

आज आपल्याशी बोलताना मी काहीसा व्यथित आहे. औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी मनातून दुःखी झालो आहे. जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघाले आहेत आपण त्यांना आजही सांगतो आहे की राज्य सरकार तुमच्यासोबत आहे. इतर राज्यातल्या सुमारे सहा लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. इतर राज्यातही ट्रेन सुरु करुन केंद्र सरकार, आपलं राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचं तिथल्या सरकारसोबत बोलणी करुन मजुरांना पाठवण्यात येतं आहे. या सगळ्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला त्रस्त होण्याचं कारण नाही. तुम्ही थोडासा संयम बाळगा आम्ही तुमच्यासोबत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.