देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या दोन हजाराच्या वर गेली आहे. सोमवारी ३५२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ही संख्या २३३४ इतकी झाली आहे. देशभरात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. करोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १६० वर पोहोचली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातं आहे. आवश्यक असल्यास बाहेर पडलात तर मास्क लावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट आहे. तिथेही प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेतली आहे.