राज्यात करोनाने थैमान घातलं असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असताना त्यांच्यावर यशस्वी उपचार होत असून रुग्ण बरे होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. बुधवार पुण्यात दोन करोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं. तर मुंबई आणि औरंगाबाद येथील एका रुग्णाला घरी सोडण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत एक आणि ठाणे येथे एक रुग्ण आढळून आला आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. बुधवारपर्यंतही रुग्णसंख्या १२२ होती. आता दोन नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या १२४ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या कालावधीत कुणीही गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा, अत्यावश्यक सेवा या सगळ्या संचारबंदी आणि लॉकडाउनमधून वगळण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात बुधवारी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हे दाम्पत्य करोनाची लागण झालेलं पहिलं दाम्पत्य होतं. त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे.