राज्यात आज कोरोनाबाधित २८ नवीन रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर – वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत. सध्या बाधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो कोरोनामुळे झाल्याचे आज निश्चित झाले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता ६ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

मुंबई ७३
सांगली २४
पुणे मनपा १९
पिंपरी चिंचवड मनपा १२
नागपूर ११
कल्याण – डोबिवली ७
नवी मुंबई ६
ठाणे ५
यवतमाळ, वसई विरार प्रत्येकी ४
अहमदनगर
सातारा, पनवेल प्रत्येकी २
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया प्रत्येकी १
इतर राज्ये – गुजरात १
एकूण १८१

राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २६ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७ हजार २९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५९२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.