करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असून यामुळे अनेक भारतीय देशाबाहेर परदेशात अडकले आहेत. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेपूर प्रयत्न सुरु असताना इंडोनेशियात ३३ भारतीय अडकले आहेत. लवकरात लवकर आपली सुटका करावी यासाठी ते केंद्र आणि राज्य सरकारकडे मदत मागत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहेत. या सर्वांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसून आपल्याकडे ३० मार्चपर्यंत पुरेल इतकाच पैसा असून त्याआधी आपल्याला मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. भांडुपमध्ये वास्तव्यास असणारे दिनेश पानसेर आपल्या पत्नीसोबत १४ तारखेला बाली येथे गेले होते. २१ तारखेला पुन्हा ते परतणार होते. पण याचवेळी करोनाने थैमान घालण्यास सुरुवात केल्याने त्यांचा परतीचा मार्ग बंद झाला. परत येण्यासाठी त्यांनी विमानाचं तिकीटही बुक केलं होतं. पण विमान वाहतूक बंद झाल्याने आणि भारताने सिंगापूर येथून येणाऱ्या विमानांना बंदी घातल्याने त्यांच्यापुढे कोणताच पर्याय राहिला नाही. दिनेश पानसरे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, आपण बालीमध्ये अडकलो असून कोणतीही मदत मिळत नाही आहे. आपण वारंवार येथील दुतावासाशी संपर्क साधत आहोत. ट्विटरवर वारंवार पोस्ट टाकून आपण सर्वांना टॅग करुनही अद्याप कोणतीही मदत पोहोचली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. Please help us sir , we are truly in bad situation in indonesia Bali. — Dinesh Kishori (@DineshPansare) March 25, 2020 Our concerns were conveyed but we haven't received any fruitful answer yet. how will we survive, stay alive? Food? Accomodation?Our finances are on the brink of extinction. We have nothing sir, help us! Send us to India, please. — Dinesh Kishori (@DineshPansare) March 25, 2020 दिनेश पानसरे यांनी सांगितल्यानुसार इंडोनेशियात सध्या ३३ भारतीय अडकले आहेत. याशिवायही अजून काहीजण अडकल्याची भीती आहे. ट्विटरला आपण माहिती टाकल्यानंर तिथे अडकलेल्या अनेकांनी आपल्याशा संपर्क साधला. हे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी असून आम्ही १६ जण बालीत एकत्र आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील पाच ते सहा जण असून बाकीचे महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि इतर ठिकाणचे आहेत. अलिबागमधील एका मित्राच्या हॉटेलमध्ये सध्या आम्ही राहत आहोत. पण जास्त वेळ तिथे थांबू शकत नाही. त्याच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. ज्याप्रमाणे मलेशियामधून भारतीयांची सुटका कऱण्यात आली त्याप्रमाणे आम्हालाही पुन्हा मायदेशी नेण्यात यावं अशी विनंती ते करत आहेत. दिनेश पानसरे यांनी फेसबुकवरही व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्याकडे फक्त ३० मार्चपर्यंत पुरेल इतकाच पैसा आणि सामग्री उपलब्ध असल्याचं ते व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. लॉकडाउन करणं गरजेचं आहे. पण आम्ही अडकलो आहोत त्यामुळे आमची सुटका करावी आणि कुटुंबाकडे पोहोचण्यास मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.