राज्यात आज दिवसभरात ६ हजार ८४३ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर १२३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ५ हजार २१२ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी कमी होताना दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असतानाच, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबतही सतर्क केले जात आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्यी ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,३५,०२९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६८,४६,९८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६४,९२२ (१३.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१७,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,९८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.