लॉकडाऊनमुळे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मुलांना दुचाकीवरुन वडिलांचा मृतदेह न्यावा लागल्याची दुर्दैवा घटना डहाणूत घडली आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयात हा दुर्दैवी प्रकार घडला. करोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या देशात लॉकडाऊन सुरू असून आहे. लॉकडाउनमुळे रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्याचा फटका कासा भागातील पालघर तालुक्यातील चिंचारे येथील एका कुटुंबाला बसला. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने न्ही मुलांना वडिलांचा मृतदेह दुचाकीवरून न्यावा लागला.

चिंचारे येथील लडका देवजी वावरे (६०) यांना २४ मार्च रोजी सकाळी आठ वाजता सर्पदंश झाला होता. उपचारासाठी त्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार पूर्ण झाल्याचं सांगून कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला. मात्र घरी असताना दोन दिवसांनी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने दुचाकीवरून रुग्णायलात घेऊन जात असतात वाटेत त्यांची तब्येत बिघडली आणि मृत्यू झाला. त्यानंतर घरी जाण्यासाठी वाहनाची उपलब्धता नसल्याने नाइलाजाने त्यांच्या दोन्ही मुलांनी मोटरसायकलवरूनच मृतदेह घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार केले नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप धोंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मयत रुग्णाला विषारी साप चावला होता, मात्र उपचारानंतर ते बरे झाले होते. त्यांना इतर आजार असण्याची शक्यता असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल”.