मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्हिडिओद्वारे संवाद साधताना पुन्हा राज्यातील लोकांना सहकार्य करावं असं आवाहन केलं. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सर्वजण मिळून करोनावर मात करूयात. संकट गंभीर आहे. पण हे सरकारही खंबीर आहे. असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे दहा मुद्दे …

  • टेहळणी किंवा फेरफटका मारायला घराबाहेर पडू नका, कृपया घरात राहा, सुरक्षित राहा,
  • जीवनाश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेमधील वाहतुकीस अडथळा नको. नागरिकांनी देखील सूचनांचे पालन करीत गांभीर्य ठेवावे
  • मी काहीही बंद करायला आलेलो नाही. उलटपक्षी आपण करीत असलेल्या सहकार्यासाठी आपले आभार मानायचे आहेत.
  • केंद्राचं आभार, विनंतीनुसार आज रात्रीपासून देशांतर्गत विमान सेवा बंद होत आहे. गेल्या आठवड्यातच मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कर व जीएसटी परतावा तारीख वाढवून देण्याची विनंती केली होती ती त्यांनी मान्य केली आहे त्यासाठी आभार.
  • सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची, शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, आणि संबंधित कामगार ने आण करणारी वाहने अडवली गेली नाही पाहिजे अशा सुचना मी दिल्या आहेत.
  • अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या संस्था, कंपन्यांनी आपल्या वाहनांवर कंपन्यांचे नाव ठळकपणे लावावे तसेच कोणत्या आवश्यक वस्तूची वाहतूक करीत आहोत ते त्यात स्पष्ट लिहावे.
  • अत्यावश्यक सेवेतील किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी अडचण येत असेल तर पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल करा
  • जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचा आपल्याकडे पुरेसा साठा आहे. मी आजच अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानाही सुचना दिल्या आहेत. अजिबात काळजी करू नका.
  • या अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, मंदिरे मदतीसाठी पुढे आले आहेत. लालबागच्या राजाने रक्तदान शिबिरे सुरु केले आहे तर शिर्डी, सिद्धीविनायक यांनी देखील आपापल्या परीने मदतीची तयारी दाखविली आहे. मदत करणाऱ्या संस्थाना कुठेही अडचण येऊ नये अशा सुचना मी दिल्या आहेत.
  • हा महत्वाचा टप्पा आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडूत