राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही मोठे व महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या उद्देशाने आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील सद्य परिस्थिती व लॉकडाउनबाबत सविस्तर चर्चा झाली. याबाबत बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना, मुख्यमंत्र्यांचा कल लॉकडाउनच्या दिशेने आहे, मात्र  अद्याप काही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “जळपास दोन तास मुख्यमंत्र्यांनी व्हर्चुअली राज्यातील सगळ्या विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये प्रत्येकानेच अतिशय सविस्तरपणे करोनाचं वाढतं प्रमाण आणि लॉकडाउन किंवा कडक निर्बंध केल्याने सामान्य माणसाची होणारी होरपळ या दोन्ही बाजू सगळ्यांनीच प्रभावीपणे मांडल्या, पण यातून सर्वात शेवटी अद्याप निर्णय काही झालेला नाही. परंतु मुख्यमंत्र्यांची दिशा या करोनावर नियंत्रण करायचं असेल, तर कडक लॉकडाउन करावा अशी दिसते.”

“संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार”; उपमुख्यमंत्र्यांचं सूचक विधान!

तसेच, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हा आग्रह धरला आहे, की यामध्ये विविध घटकांचा आपण काय विचार करणार आहोत? किती दिवस हे सगळं चालणार आहे. यावरील नेमक्या उपाय योजना काय? अशी काही ठोस योजना तुम्ही मांडल्याशिवाय जर घाईघाईने लॉकडाउन केलं, तर त्याचा फार मोठा उद्रेक होईल.मुख्यमंत्र्यांनी बहुतेक हे मान्य केलं. त्यांचा कल कडक लॉकडाउनच्या दिशेने आहे. पण त्यांनी हे देखील मान्य केलं की अशी काही ठोस योजना बनवावी लागेल.” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

निर्बंध शिथिल की अधिक कडक?

“मी जो मुद्दा नेहमीच मांडत असतो, तो आजही मांडला आणि शेवटी वारंवार मांडण्याचा परिणाम असेल, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मान्य केलं की, सोमवारी असे जे हातावर पोट असणारे समाजातील घटक आहेत, त्यांना काय पॅकेज देता येईल, याचा विचार आम्ही करू. त्यांनी यामधील जी अडचण सांगितली, ती बरोबर नाही. ते म्हणाले की, याच्या नेमक्या संख्या नसतात.. तर सगळ्यांच्या संख्या असतात. सगळे रिक्षावाले, टॅक्सीवाले, फेरीवाले, घरकाम करणारे रजिस्टर असतात, त्यामुळे सरकारला प्रश्न पडण्याचं काही कारण नाही. इच्छा शक्ती असेल तर सर्वसामान्यांचं पोट भरण्याच्यादृष्टीने सोमवारी तुम्ही निर्णय़ घेऊ शकतात.”