राज्यात करोना संसर्गाचा वेग आता अधिकच झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून, मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाउन देखील सुरू करण्यात आला आहे. आज दिवसभरात राज्यात ८७ रूग्णांचा मृत्यू झाला असून, १७ हजार ८६४ करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ टक्के एवढा झाला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण १,३८,८१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज ९ हजार ५१० रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,५४,२५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.७७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७७,१५,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,४७,३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५२,५३१ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ६ हजार ६७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.