पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाउनसंबंधी सर्वांचं मत जाणून घेतलं. याच बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीमध्ये काय झालं याची माहिती दिली. त्याचबरोबर राज्यातील लॉकडाउनचा कालावधी आणखीन १५ दिवसांनी वाढवण्यात येत असल्याची महत्वाची घोषणा केली. राज्यामध्ये किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना देशभरातील वेगवगेळ्या राज्यांमधील मुख्यमंत्री, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार एकजुटीने काम करत असल्याचे मत मांडले. तसेच ही एकजूट अशीच कायम राहिली तर करोनावर मात करुन भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नक्की वाचा >> “आयुष्यभर राजकारण सोडून दुसरं काय केलं? पण या गोष्टीत मला राजकारण नकोय”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. “या बैठकीमध्ये सर्वात आधी मला बोलण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी आपण महाराष्ट्रातील लॉकडाउन १४ नंतरही सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले, “अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. पुढे बोलताना त्यांनी या संकटावर मात करण्यासाठी देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्र सरकार एकत्र आणि एकजूटीने काम करत असल्याचेही सांगितले.

नक्की वाचा >> “आजपर्यंत कोणी आमचं तोंड बंद करु शकलेलं नाही, ती हिंमत कोणातही नाही; पण…”

“जे चित्र, जे वातावरण मी गेल्या दोन ती वेळेला या पंतप्रधानांबरोबरच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बघतोय. ते वातावरण असचं राहिलं, एकजूट अशीच राहिली. ती केवळ आत्ताच नाही सदासर्वदा राहिली तर आपला देश या करोनाच्या संकटावर मात करेलच. आपल्या महाराष्ट्राबरोबर इतरही राज्य नक्कीच करोनावर मात करतील. पण त्याचबरोबर आपला देश ही जगातील महासत्ता बनू शकेल,” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी देशभरातील राज्य सरकारे आणि केंद्र सरकारचं कौतुक केलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी “अमेरिकेला आपल्याकडून औषधे मागवली. एकूणच काय सगळेच अडचणीमध्ये आहेत. सर्वांनाच काही ना काही भोगावं लागतंय, सोसावं लागतयं कोणालाच ही बंधने आनंददायी नाहीयत,” असंही सांगितलं.