करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न असताना बाधितांची संख्या मात्र वाढत चालली असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला संथ असलेल्या करोनाच्या संसर्गानं महिनाअखेरीस उसळी घेतली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली. दुसरीकडं मृत्यूदरही वाढला असून महाराष्ट्रातील परिस्थिती काळजी करण्यासारखी बनली आहे. देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आणि झालेल्या मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे १४ एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाउन कायम राहणार असल्याची शक्यता असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.