अभिनेता रितेश देशमुख नेहमीच समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर आपली भूमिका मांडत असतो. भारतात करोनानं प्रवेश केल्यानंतर रितेश आणि जेनेलिया दोघेही लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. सध्या देशात संचारबंदी लागू करण्यात आली असून महाराष्ट्रात संचारबंदीबरोबर जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण आहेत तिथेच अडकून पडले आहेत. अशातच एका पाण्याच्या टँकरचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, ते बघून रितेश देशमुख संतापला आहे. ‘काय चाललं आहे? भारतातच लोकांची तस्करी सुरू आहे का?,’ असा संतप्त सवाल त्यानं उपस्थित केला आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दिवसेंदिवस करोनाग्रस्त रुग्णांची वाढत आहे. देशातील संख्या ६००च्या पुढे गेली आहे. तर महाराष्ट्रातील आकडा १२४वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे यात आतापर्यंत १५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून देशात लॉकडाउन लागू करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. काही ठिकाणी अडकलेलं लोक पायीच घरी जात असल्याचं दिसत आहे. अशातच एका टँकरमधून लोक उतरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून अभिनेता रितेश देशमुखला संताप अनावर झाला.रितेश हा व्हिडीओ ट्विट करून प्रश्नही उपस्थित केला आहे. ‘हे काय चाललं आहे? देशातच लोकांची तस्करी सुरू आहे का? असा प्रश्न रितेश उपस्थित केला आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असताना रितेशनं लोकांना त्यापासून बचाव करण्याचं आवाहन केलं होतं. रितेश व जेनेलिया दोघांनी एक व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला होता.