मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मनोबल वाढवतानाच करोनाच्या आजारामुळे देशावर घोंगावत असलेल्या संकटाची जाणीव करून दिली. ‘करोनावर आपण विजय मिळवणारच आहोत. पण, त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनाचं पालन करा. करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठं आहे. जर सूचनाचं पालन केलं नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा पवार यांनी जनतेला दिला.

आणखी वाचा- करोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक : शरद पवार

फेसबुक लाईव्हद्वारे शरद पवार यांनी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, ‘घरातच थांबा, बाहेर पडू नका. लॉकडाउनच्या काळात मी सुद्धा घराबाहेर पडलेलो नाही. या काळात दैनंदिन स्वच्छता पाळा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याला जपा. हे संकट मोठं आहे. पुढचे काही महिने आपल्याला काटकसर करावी लागणार आहे. वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. करोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. नगर पालिकांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसणार आहे,’ असं भाकित शरद पवार यांनी केलं.

आणखी वाचा- परदेशातून आल्याची माहिती दडवली; एकाच कुटुंबातील सात करोना संशयित रूग्णालयात

‘राज्याला पुरेल इतका अन्नधान्य साठा आहे. त्यामुळे जिथे आहात तिथे राहा. ऊसतोड कामगारांची व्यवस्था कारखानदारांनी करावी अशी सूचना केली आहे. मात्र, खेदजनक बाब म्हणजे अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे बाहेर फिरू नका. पोलिसांवर कारवाईची वेळ येऊ देऊ नका. त्याचबरोबर अशा काळात काळाबाजार होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. आजच्या स्थितीतही राज्य सरकार सामंजस्यपणानं काम करत आहे. सरकारला भूमिका घ्यायला भाग पाडू नका. जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याची गरज नाही. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपापल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी माहिती देत आहेत. त्यावर विश्वास ठेवा, सूचनांचं पालन करा,’ असं आवाहन शरद पवार यांनी केलं.