रुग्णांकडून नातेवाईकांना संसर्ग; शहरी भागात शासकीय विलगीकरण व्यवस्था अपुरी

पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०९१ नागरिकांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी १२९२ रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. पालघर, बोईसर, डहाणू या भागांमध्ये विलगीकरणासाठी शासकीय विलगीकरण केंदे्र कमी असून त्याबरोबर उपलब्ध केंद्रांमध्ये नागरिक दाखल होत नसल्याने गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडून त्यांच्या नातेवाईकामध्ये आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात असलेल्या रुग्णांपैकी सुमारे ९०० रुग्ण हे पालघर- बोईसर परिसरातील आहेत. पालघर येथील करोना काळजी केंद्र भरण्याच्या स्थितीत असून बोईसर येथे सध्या असे एकही केंद्र कार्यरत नाही. जव्हार तालुक्यात सध्या ३२० रुग्ण असून डहाणू तालुक्यातील रुग्णसंख्या १८७ वर पोहोचली आहे. इतर तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागातील २०९१ उपचारांची रुग्णांपैकी १५१४ रुग्ण गृह विलगीकरणात असून त्यांच्याकडून याबाबतची नियमांचे पालन होत नसल्याने आजार झपाट्याने पसरत आहे. गृह विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या हातावर छापे मारणे आवश्यक असून सक्रिय रुग्ण तसेच आरटीपीसीआर तपासणी केलेल्या रुग्णाच्या हातावर त्या आशयाचे छापे मारणे गरजेचे झाले आहे.

रुग्णांचा शोध घेणे आव्हानात्मक 

आजाराची लक्षणे असणारे अनेक नागरिक खसगी डॉक्टरांकडून उपचार घेतात. अशा नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचा सल्ला दिल्यानंतरदेखील त्याचे पालन होत नसल्याचे डॉक्टरांकडून

सांगण्यात येते. अशा संशयित रुग्णांची यादी शल्य चिकित्सक कार्यालयाकडे पाठवण्यात येत असली तरी मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे अशा नागरिकांचा पाठपुरावा होत नाही.

आरटीपीसीआर तपासणीसाठी येणारे अनेक नागरिक आपला पूर्ण पत्ता किंवा माहिती देत नाहीत. आपल्याला संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर अनेक रुग्ण आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना तसेच आरोग्य विभागाला त्यांच्यापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरते. अशीच मंडळी नियमांचे पालन करत नसल्याने आजाराचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरतात.