कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमावर रद्द करण्यात आली आहे. चैत्र पौर्णिमेला गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर मंगळवारी सुनासुना झाला होता. चैत्र यात्रेचा आज मुख्यदिवस असल्याने लाखो भक्तांचे आराध्यदैवत श्री जोतिबा देवांची दरबारी अलंकारिक महापूजा बांधली होती. दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश यासह अन्य काही राज्यातील भाविक चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेसाठी या ठिकाणी येत असल्याने वाडी रत्नागिरीचा डोंगर भाविकांच्या गर्दीत हरवून जात असतो. सहा लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात. या अगोदर १८९९ मध्ये प्रथमच जोतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली होती. तेव्हा प्लेगची साथ असल्याने यात्रा बंदचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर आता करोनाच्या साथीमुळे चैत्र यात्रा रद्द झाली आहे. त्यामुळे मंदिरात पुजाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे विधिवत पुजा केली. कोणीही सासनकाठी आणू नये असे आवाहन करण्यात आल्याने भक्तांची वर्दळ पुर्णतः थांबली होती. गुलालाची उधळण करत आणि 'जोतिबाच्या नावाने चांगभलं' असा जयघोष करत उंच जरीपटका आकाशामध्ये फडकत मिरवणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर आज प्रथमच दिसल्या नाहीत. बंदोबस्तावरील पोलीस यंत्रणा वगळता जोतीबाचा डोंगर पुर्णतः निर्मनुष्य होता.