राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत राज्यातील आकडेवारीची माहिती दिली आहे. यानुसार सोमवारी महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण आढळले. तर ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान टाळेबंदीची मुदत वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून टाळेबंदीबाबत सुधारित अधिसूचना जाहीर केली असून, मुंबई महानगर प्रदेश, पुणे-पिंपरी-चिंचवड, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात टाळेबंदी अंशत: शिथिल केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि ठाणे ही प्रमुख शहरे बंदच राहणार आहेत. देशभरात एकूण रुग्णांची संख्या ४२,८३६ इतकी झाली असून गेल्या २४ तासांमध्ये २,५३३ रुग्णांची भर पडली आहे. २९,४५३ रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. तर, २४ तासांमध्ये ८३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यू १३८९ झाले आहेत. रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण वाढत असले तरी त्याची तीव्रता कमी झाली आहे. १२ दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत आहेत. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी हे प्रमाण तीन टक्के होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सोमवारी दिली.