गेल्या चोवीस तासांमध्ये ३,३९० नव्या करोना रुग्णांची भर पडली असून देशात एकूण करोना रुग्णांची संख्या ५६,३४२ झाली असून १,८८६ मृत्यू झाले आहेत. १६,५३९ रुग्ण बरे झाले आहेत. रुण बरे होण्याचे प्रमाण २९.३३ टक्के इतके झाले आहे. रुग्णालयातील रुग्णांपैकी ४.७ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ३.२ टक्के रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. १.१ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. देशातील २१६ जिल्हे करोनामुक्त असून ५२ जिल्ह्य़ांमध्ये २८ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. २७ जिल्ह्य़ांमध्ये २१ दिवस तर, ३७ जिल्ह्य़ांमध्ये १४ दिवसांमध्ये, ६९ जिल्ह्य़ांमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. केंद्रीय आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ६३ इतकी झाली आहे. मागील २४ तासात ३७ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आज १६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत ३ हजार ४७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली.