सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचं सांगत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे लोकांचा गोंधळ होत असल्याचं नाकारलं जाऊ शकत नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. मजुरांच्या स्थलांतराचे विदारक चित्र सरकारला अशोभनीय असून मनाला वेदना देणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नावर नेमका काय इलाज केला पाहिजे हे मलाही सुचलेलं नाही. पण हा मुद्दा मी प्रकर्षाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मी हा विषय मांडला असताना अनेकांनी मला पाठिंबा दिला,” असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी उद्योग सुरु केले तर हे स्थलांतर थांबण्याची शक्यता आहे असं सुचवताना लॉकडाउन हा एकमेव उपाय असू शकत नाही असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

“निर्णय़ बदलत असल्याने लोकांमध्ये संभ्रम पसरत आहे. निर्णय घेण्याचे सगळे हक्क जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना आहेत. आम्ही सूचना देत असलो तरी निर्णय अधिकारीच घेतात. तुम्हाला अधिकार आहेत याबाबत काही म्हणणं नाही मात्र निर्णय स्थानिक पातळीवर घेताना गोंधळ नको,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरच्या निर्णयांमध्ये मेळ नसल्याचंही छगन भुजबळ यांनी मान्य केलं आहे.

“मला जास्त कळत नाही. पण जी माहिती घेतली आहे त्यावरुन करोना दोन वर्ष सोबत राहणार असं मानायला हरकत नाही. लोकांनाही आता काळजी घेण्यासंबंधी समजू लागलं आहे. रस्त्यावर चालणाऱ्या अनेक लोकांना मी तोंड झाकून चालताना पाहिलं,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. छगन भुजबळ यांनी दुकानं जास्त वेळ उघडी ठेवली तर गर्दी कमी होईल असंही म्हटलं आहे. हळूहळू उद्योग सुरु करायला हवेत असं सांगताना अनुभवाप्रमाणे निर्णय घेतले गेले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी लगेचच लॉकडाउन जाहीर न करता चार दिवसांनी अमलबजावणी होईल असं सांगितलं असतं तर लोक आपापल्य घरी निघून गेले असते. अचानक लॉकडाउन जाहीर करणं चुकीचं होतं. दोन महिने सगळं बंद राहणार आहे माहिती असतं तर लोक न थांबता आपापल्या घरी गेले असते असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.