पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाशी सामना करण्यासाठी २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज मला पर्याप्त वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच २० लाख कोटी हे रोखीने खर्च करणं अपेक्षित असून अमेरिकेतील लेंडिंग आणि स्पेंडिंग धोरणानुसार विचार करणे अपेक्षित असल्याचं मत त्यांनी नोंदवलं आहे. पॅकेजमध्ये आरबीआयने केलेली मदत गृहित धरली जाऊ नये असंही ते म्हणाले आहेत.

“अमेरिकेने जीडीपीच्या ११ टक्के, जपानने १० टक्के, जर्मनीने २२ टक्के इतकं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. त्यामुळे २०४ लाख कोटींची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताने १० टक्के खर्च करणं अपेक्षित होतं. आता लोकांना विश्वास देणे आवश्यक आहे. पुरवठा जरी झाला तरी मागणी कशी वाढेल याकडे लक्ष द्यावं लागेल. अर्थव्यवस्थेचं चक्र फिरतं ठेवायचं असेल तर कामगार, शेतकऱ्यांच्या खिशात पैसे पोहोचणं गरजेचं आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

“कामगारांचे पैसे देण्यासाठी कंपन्यांकडे पैसे नाहीत. कामगारांना टिकवायचं असेल तर त्यांना थेट पैसे देण्याची गरज आहे. लघु उद्योगांना चालना आवश्यक आहे. लोकांच्या खिशापर्यंत कसा पोहोचवायचा याचा विचार केला पाहिजे. ग्राणीन भागात यासाठी मनरेगा चांगला मार्ग आहे. शहरी भागात मनरेगासारखा मोठा कार्यक्रम राबवता येऊ शकतो पाहिजे,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदवलं आहे.