कल्याण-डोंबिवलीमधील करोनाग्रस्तांची संख्या आठवर पोहचली आहे. शहराच्या प्रथम नागरिक असणाऱ्या महापौर विनिता राणे यांनाही करोनाग्रस्त रुग्ण उपस्थित असलेल्या लग्नाला लावलेल्या हजेरीमुळे १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाने केल्या आहेत. एकंदरीतच कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता शहरामध्ये करोना चाचणी करण्याची परवानगी खासगी लॅबला देण्यात यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं आहे. पाटील यांनीच ही माहिती ट्विटवरुन दिली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. डोंबिवलीमधील रुग्ण सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये भीतीचे वातावरण असल्याचे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये करोना चाचणीची सोय उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये चाचणी करण्यासाठी जावं लागत आहे. मात्र तेथील लॅबमध्येही रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे चाचणीचा निकाल हाती येण्यास वेळ लागत आहे. त्यामुळेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे करोना तपासणी लॅब असणे आवश्यक असल्याचे, राजू पाटील यांनी म्हटलं आहे. शहरातील खासगी लॅबला करोना तपासणीची परवानगी द्यावी, अशी विनंती राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मा.मुख्यमंत्री साहेब, कल्याण-डोंबिवली परिसरात #coronavirus बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे, त्यामुळे एकंदरीत केडिएमसी व परिसरातील लोकसंख्या पाहता इथेही कोरोना टेस्टींग लॅब असणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra @rajeshtope11 @KDMCOfficial pic.twitter.com/27P9F6oYaH — Raju Patil (@rajupatilmanase) March 29, 2020 नक्की वाचा >> संकटाच्या या काळात राजही फोन करतोय -उद्धव ठाकरे कल्याण-डोंबिवलीमधील परदेशातून आलेल्या एका तरुणाला करोना झाल्याचे चाचणीमधून उघड झालं आहे. हा तरुण हजारहून अधिक नागरिक उपस्थित असणाऱ्या लग्नाला हजर होता अशी माहिती समोर आली आहे. या तरुणाच्या गैरजबाबदार वागण्यामुळे महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये हा तरुण डोंबिवलीमधील ज्या ज्या भागांमध्ये जाऊन आला आहे तिथे महापालिकेच्या मार्फत फवारणी केली जात आहे. तसेच हा तरुण राहत असलेल्या आणि तो ज्यांच्या संपर्कात आला आहे अशा लोकांची तपासणी केली जात आहे.