आज जगात करोना विषाणुने थैमान घातले आहे. हजारोंच्या संख्येने लोक मृत्युमूखी पडत आहेत. शासन – प्रशासन यंत्रणा सर्व स्तरावर सर्व शक्तीनिशी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतांनाही हतबल झाले आहेत. अनेक मुस्लीम देश सर्व प्रकारच्या सामुदायिक प्रार्थना, धार्मिक सण, जुम्माचा नमाज मस्जिद मध्ये अदा न करता आपआपल्या घरी अदा करण्याचा उपदेश करीत आहेत.

पंतप्रधान आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या मा. मुख्यमंत्र्यांनी वारंवार आवाहन करुन मंदिर, मस्जिद, दर्गा, चर्च, विहार, गुरुद्वारा व इतर धार्मिक स्थळे बंद ठेवावीत असे आदेश दिले आहेत. लोकांनी आपआपल्या घरात थांबून स्वतःची काळजी घ्यावी असे निर्देश दिले आहेत. या भयावह वातावरणात आरोग्य, प्रशासन, पोलीस क्षेत्रातील अधिकारी – कर्मचारी जीवाची बाजी लावून ही महामारी रोखण्यासाठी तसेच रुग्णाःवर उपचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

काही मुल्ला, मौलाना, मौलवी यांनी पत्रके काढून मुस्लीम समाजाला शुक्रवारची नमाज आणि शब्बेबरात नमाज आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन केले आहे. असे असतांनाही काही मुस्लीम बांधव अडमूठेपणा करीत मस्जिद, टेरेसवर सामुदायिक नमाज पठण करीत असल्याचे लक्षात आले आहे. “सब कुछ अल्लाह के मर्जीसे होगा, वह बचाने वाला है” वगैरे वक्तव्य करुन दुआ करायला सांगत आहेत, अंधश्रद्धाही पसरवत आहेत. अशा वर्तनामुळे काय हाहाकार माजणार आहे याचे गांभीर्य विचारात घेऊन मुस्लीम बांधवांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे. मुस्लीम बहुल वस्तीत सार्वजनिक शिस्तीचे कठोर पालन करण्याची गरज आहे. जग थांबले आहे आपणही थांबले पाहीजे, मंदिर ,चर्च, बंद आहे , मस्जिद बंद ठेवली पाहीजे. देश आणि मानवतेसमोरील हे युध्द लढतांना सर्वांसोबत मुस्लीम बांधवांनी सजग राहून सहकार्य करावे असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळ करीत असल्याचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले.