राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तज्ज्ञांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत साधारणपणे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तो ट्रेण्ड (करोनाचा आलेख) खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पुर्ण तळाला जाईल आणि पुन्हा सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येणार असली तरी करोना पूर्णपणे संपला असं समजण्याचं कारण नाही असंही म्हटलं आहे. करोना हा दैनंदिन जीवनाचा भाग होणार आहे हे मान्य करुनच आपण पुढील वाटचाल केली पाहिजे असंही पवार म्हणाले. 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत लॉकडाउनचं संकट किती काळ राहिलं?, या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी हे वक्तव्य केलं. नक्की वाचा >> …तर महाराष्ट्रात न्यूयॉर्कसारखी परिस्थिती निर्माण झाली असती : शरद पवार "करोनाचं संकट दिर्घकाळ राहणार आहे हे तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे पण हे लॉकडाउनचं संकट किती काळ राहिलं?," असा प्रश्न राऊत यांनी शरद पवारांना विचारला. त्यावेळेस पवारांनी करोनासोबत जगण्याची सर्वांनी तयारी ठेवली पाहिजे असं मत व्यक्त केलं. "जगासमोर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे आहे की इथून पुढं प्रत्येक नागरिकाची करोनासोबत जगायच्या संबंधीची आपली तयारी असली पाहिजे. करोना हा आपल्या दैनंदिन जिवनाचा भाग होत आहे अशी भूमिका तज्ज्ञांकडून मांडली गेली आहे. त्यामुळे आपण हे मान्य करायला हवं आणि ही परिस्थिती गृहित धरुन पुढे जाण्याच्या हिशोबाने नियोजन केलं पाहिजे," असं करोनासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले. नक्की वाचा >> ‘त्या’ दीड महिन्याच्या कालावधीत मी घराच्या बाहेरच पडलो नाही : शरद पवार लॉकडाउनचा प्रश्न मात्र चिंताजनक परिस्थिती निर्माण करतो, असं सांगतानाच परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाही काळजी घेणं गरजेचं असल्याचं पवार म्हणाले आहेत. करोनासोबत जगावं लागेल मात्र लॉकडाउनसहीत जगावं लागेल असं मला वाटतं नाही, असं मत पवारांनी व्यक्त केलं. "मी काही तज्ज्ञांनी बोललो त्यांच्या सांगण्यानुसार साधारणपणे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तो ट्रेण्ड (करोनाचा आलेख) खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पुर्ण तळाला जाईल आणि पुन्हा नॉर्मलन्सी येईल. मात्र याचा अर्थ तो (करोना) कायमचा संपला असं नाही. तो रिव्हर्सही येऊ शकतो. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला करोनासंदर्भातील काळजी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे इथून पुढं आपल्या सगळ्या व्यवहारात अशी परिस्थिती उफाळून आल्यास लॉकडाउनची वेळ पुन्हा येऊ शकते. लॉकडाउनमुळे जी जी काही परिस्थिती येईल त्या सर्वांना तोंड देण्याची आपली सर्वांची तयारी हवी. यामुळे मग अगदी अर्थव्यस्था, कुटुंब, व्यापार आणि प्रवासासंदर्भात काही गोष्टींवर परिणाम झाल्यास त्याबद्दलही तयार रहायला हवं," असं मत पवारांनी मांडलं. करोनासंदर्भातील धडा पाठ्यपुस्तकांमध्ये हवा "पाठ्यापुस्तकांमध्ये जे अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये आपण मागील दोन अडीच महिन्याचा जो करोनाचा कालखंड आहे त्यात जे अनुभव घेतले आहेत त्यावर अशा परिस्थितीत काय काळजी, खबरदारी घ्यावी यासंदर्भातील एखादा दुसरा धडा असला पाहिजे," असं मतही पवारांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.