देशातील करोना संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. करोना रुग्णसंख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून, मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. देशात दिवसाला ७० रुग्णसंख्या आढळून येण्यास सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना मृत्यूपैकी ४२ टक्के मृत्यू हे फक्त ११ जिल्ह्यांमध्ये झाले आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे या यादीत राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशातील एकूण करोनाशी संबंधित मृत्यूचा आकडा मोठा आहे. त्यातील ४२ टक्के मृत्यू देशातील ११ जिल्ह्यांमध्ये नोंदवण्यात आले आहेत. या यादीत मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि पुणे हे जिल्हे अग्रक्रमावर आहेत. पण, महाराष्ट्राच्या दृष्टीनं ग्रामीण भागाशी निगडित असलेल्या नाशिक, नागपूर आणि जळगाव या जिल्ह्यांचाही या यादीत समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एक हजाराहून अधिक करोना संबंधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

आणखी वाचा- Coronavirus : राज्यात २४ तासांत आठ पोलिसांचा मृत्यू ,३७१ नवे करोनाबाधित

पहिल्या अकरा जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे या जिल्ह्यांसह या जिल्ह्यांच्या तुलनेत आकारानं छोट्या असलेल्या नागपूर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्येही आतापर्यंत १ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नागपूर व नाशिक हे दोन्ही जिल्हे बाधित रुग्णसंख्येच्या यादीत पहिल्या १० जिल्ह्यामध्ये येतात. तर जळगावमधील रुग्णसंख्या कमी असली, तरी २५ जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचा समावेश होतो.

आणखी वाचा- खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती, राजेश टोपेंची घोषणा

राज्यातील आणखी काही जिल्ह्यांतील मृतांची संख्या १ हजाराच्या दिशेनं जात आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रातील असून, राज्याचा मृत्यू दर सध्या २.८२ टक्के इतका आहे. जो देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्याचबरोबर राज्यात दररोज सर्वाधिक मृत्यूची नोंद होऊ लागली आहे.