राज्यात करोनानं थैमान घातलं असून नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जनता संचारबंदी नंतर शहरातील अनेक किराणा दुकानांवर नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे. पुण्यातही आज एका दुकानात अशीच गर्दी झाली होती. त्यामुळे सांगवी पोलिसांनी दुकान मालकालाच पकडलं आणि उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. प्रशासनाने अत्यावश्यक सेवा आणि किराणा मालाच्या दुकानांवर बंदी घातलेली नाही. मात्र, तरीही नागरिक गैरसमजामुळे दुकानांवर गर्दी करत आहेत.

रविवारी पिंपरी-चिंचवडकरांनी जनता संचारबंदीचं काटेकोरपणे पालन केलं. करोना विषाणूशी लढा देणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, राज्य आणि केंद्र शासन आणि इतर कर्मचाऱ्यांचे टाळ्या आणि थाळी वाजवून आभार मानले. दरम्यान, रविवारी दिवसभर कडेकोट बंदोबस्त असल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. अनेकांना किराणा मालाचे दुकान केव्हाही बंद पडू शकते असा गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे ृशहरात प्रत्येक किराणा दुकानावर प्रचंड गर्दी झाली होती. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानावरही नागरिकांची अशीच गर्दी झाली होती. त्यामुळे गर्दी झालेल्या दुकान मालकाला बोलावून २० उठाबशा काढण्याची शिक्षा पोलिसांनी दिली. प्रशासनाने गर्दी टाळण्याचे सक्त आदेश दिले असले तरी नागरीक याचं पालन करताना दिसत नाहीत.